अफवांवर विश्वास ठेवू नका; लॉकडाऊन वाढवण्याचा विचार नाही - कॅबिनेट सचिव

नवी दिल्ली : देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवण्यात येणार असल्याच्या सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहेत. मात्र, चर्चा केवळ अफवा असून त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. केंद्र सरकारचा लॉकडाऊन वाढवण्याचा कोणताही विचार नाही, असे स्पष्टीकरण कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी दिले आहे. केंद्राच्या या निर्णयाबाबत माहिती देताना राजीव गौबा म्हणाले, देशातील लॉकडाऊन वाढवण्यात येणार असल्याच्या चर्चा ऐकून मला आश्चर्य वाटलं. लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. दरम्यान, २४ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना संपूर्ण देशात पुढील २१ दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली होती. मोदी म्हणाले होते, यापूर्वी झालेल्या जनता कर्म्युनं दाखवून दिलं की, देशावर ज्यावेळी कोणतही संकट येत तेव्हा संपूर्ण देश एकजुट होतो. करोनासारख्या महारोगानं जगातील सामर्थ्यशाली राष्ट्रांनाही हतबल करून ठेवलं आहे. त्या राष्ट्रांकडं साधन नाहीत, असं नाही. पण, हा आजार इतक्या वेगानं पसरत आहे की, तयारीच करता येत नाही. त्यामुळे आज रात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये जात आहे, या लॉकडाऊनचा आजचा सहावा दिवस आहे. मात्र, तरीही करोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे २१ दिवसांनंतरही लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाणार असल्याची चर्चा सर्वत्र आणि समाज माध्यमांमधून सुरु झाली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणीही अधिकृतरित्या माहिती दिली नसल्याने या केवळ अफवाच असल्याचे स्पष्ट होते. याबाबत आता कॅबीनेट सचिवांनीही लॉकडाऊन वाढवण्याचा असा कुठलाही सरकारचा विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे.