३१ मेपर्यंत या नागरिकांना कर्नाटकमध्ये नो एंट्री

महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तामिळनाडू या चार राज्यातील नागरिकांना कर्नाटकात ३१ मेपर्यंत म्हणजेच लॉकडाउनचा चौथा टप्पा संपेपर्यंत प्रवेश मिळणार नाही असं मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांनी स्पष्ट केलं. -छख ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. येडियुरप्पा यांनी असंही सांगितलं की, लॉकडाउनच्या नियमांची काटोकोर अमलबजावणी केली जाणार आहे. करोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सेवांची दुकानं बंद असतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच करोना प्रतिबंधित क्षेत्रात फक्त अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकानं सुरु असतील तर इतर भागांमध्ये काही परवानग्या देण्यात आल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. लॉकडाउन ४ मध्ये राज्यातल्या बसेस आणि खासगी बसेसना संमती देण्यात आली आहे. या बसेसमध्ये एकावेळी फक्त ३० माणसं असतील. मास्क लावणं आणि डिस्टन्सिंग पाळणं हे महत्त्वाचं असेल. एकाही बसचं तिकिट वाढवलं जाणार नाही. ऑटो किंवा टॅक्सी सेवाही सुरु करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. मात्र यांना राज्याच्या सीमा ओलांडता येणार नाहीत. ऑटो किंवा टॅक्सी यामध्ये चालकासह एकूण तिघांनाच बसण्यासाठी संमती देण्यात आली आहे असंही त्यांनी सांगितलं. तसंच लॉकडाउन चारच्या कालावाधीत राज्यातील सर्व दुकानं खुली करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र ३१ मेपर्यंत महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमधील लोकांना येण्यास मनाई करण्यात आली आहे.