ग्रामपंचायत निवडणुकीबाबत महत्त्वाची बातमी

पुणे : राज्यात जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत प्रस्तावित असलेल्या १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका स्थगित करण्याबाबत राज्य शासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यास राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले की, राज्यात जुलै ते डिसेंबर २०२० दरम्यान १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घ्यावयाच्या झाल्यास त्यासाठी कर्मचारी प्रशिक्षण, निवडणूक यंत्रणेवर ताण, वोटींग मशिनचा सामुदायिक वापर, प्रचारासाठी होणारी गर्दी, सभा, मेळावे, पदयात्रा या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी अनेक लोक एकत्र येण्याची शक्यता आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता अशी गर्दी धोकादायक ठरु शकते. शिवाय, ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी करणे, प्रभागाची रचना प्रस्तावित करणे, प्रभागनिहाय मतदारयादी तयार करणे आदी बाबींकरिता मोठा वेळ लागतो. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याची आवश्यकता लक्षात घेऊन तसेच प्रस्तावित निवडणुकांमुळे वाढणारी तीव्र जोखीम लक्षात घेऊन या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात व पुढील ६ महिने कोणत्याही निवडणुका न घेण्याबाबत सूचना द्याव्यात, अशी विनंती राज्य शासनामार्फत राज्य निवडणुक आयोगाकडे करण्यात आली होती.