अलिबाग : रायगड जिल्ह्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असून १०० कोटी रुपयांच्या तातडीच्या मदतीची घोषणा केली आहे. 'ही सुरुवात आहे. याला पॅकेज म्हणू नका. आम्ही थेट मदतीला सुरुवात केली आहे,' असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे. ___ कोकणच्या किनाऱ्यावर बुधवारी धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळं रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक घरांची पडझड झाली असून हजारो संसार उघड्यावर पडले आहेत. झाडे उन्मळून पडली आहेत. शेती आणि जनावरांनाही मोठा फटका बसला आहे. या नुकसानीसाठी मुख्यमंत्री आज रायगड दौऱ्यावर आहेत. अलिबागच्या काही गावांमध्ये काही गावांमध्ये पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला व मदतीची घोषणाही केली.
उद्धव ठाकरे काय म्हणाले...
* आपत्ती काळात जीवितहानी होऊ नये यासाठी प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने प्राणहानी झाली.
* हे नुकसान भरून येणार नाही, शासनाने मदत दिली पण यापुढे जीवितहानी होता कामा नये यासाठी शासन प्रयत्न करणार
* कोरोना संकट आहेच,काळजी घेतली त्यात वादळ आले,आता पुन्हा नव्याने सुरू करायचे आहे
* प्रथम झाडांची साफसफाई करावी,आवश्यक त्या सर्व सुविधा आणि मदत केली जाईल.
* संकट सर्वांसाठी असते, पक्ष मतभेद विसरून आपण एकत्र काम करून रायगड जिल्हा पुन्हा उभा करू * घरांची पडझड झाली आहे, त्यांना तातडीने मदत करणार.
* मच्छिमारांचे जे नुकसान झाले आहे त्याबददल शासन मदत देणार
* कोरोनाचा धोका पावसामुळे देखील वाढू शकतो, इतर रोगराई पण थांबवायची आहे. सरकार कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही.